इंटरनेटच्या मंथनातून निघालेली रसायनं
अगणित न संपणाऱ्या साखळीप्रमाणे येत जातात रीळमागे रीळ.. एका यंत्राप्रमाणे सरकवत असतात त्यांना हाताची बोटं... विसर पडतो आयुष्याच्या क्षणभंगुरतेचा तीस सेकंदातच... पुसली जाते विस्कटलेल्या जीवनाची "स्टोरी" 24 तासात पुन्हा न कधीच दिसण्यासाठी... दुसरीकडे, पहाटेच्या निरव शांततेला चिरत व उगवत्या सूर्याच्या सोबतीने उपदेशाचं भांडार घेऊन येतो "शुभ सकाळ" मेसेज... लावले जातात स्टेटसवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर... दोन्ही हातांचे अंगठे जुंपले जातात दिवसभर टक-टक करण्यासाठी... शब्दांना वाळीत टाकून इमोजीने व्यक्त होत असतात भावना.. अन फिरत असतात खरकट्या ज्ञानाच्या निनावी पोस्ट एका ग्रुपच्या उकिरड्यातुन दुसऱ्या ग्रुपच्या उकिरड्यावर... आणि, उद्विग्न लेखक मांडत असतात विखारी विचार त्यांच्या भिंतींवर सहस्त्र अंगठ्याची चिन्हं मिळविण्यासाठी... शाब्दिक चकमकीत होत असतात बेजार रोज बैचेन आत्मे... "लाइव्ह" करून दाखवला जातो जिवंत असण्याचा पुरावा... हे मार्केश्वरा, या फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हाट्सअप्पच्या मायावी त्रिभुवनात आम्हास कैद करून तू कोणत्या विश्वात डिटोक्स होत आहेस रे! इंटरन...